म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच रहिवाशी यांच्याकडून थकीत सेवाशुल्कावरील व्याज रद्द करून सेवाशुल्क वसुल करण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार अभय योजना सुरु करण्यात आली आहे. मुंबईत म्हाडाच्या ५६ हून अधिक वसाहती आहेत. म्हाडातर्फे या वसाहतींना सेवा पुरविल्या जातात त्यापैकी म्हाडा या वसाहतींमधील रहिवाशांकडून सेवाशुल्क वसूल करते. सेवाशुल्क आकारणीच्या बदल्यात म्हाडातर्फे पंप हाऊसची देखभाल, पंप चालकाचे वेतन, टँकर्सची आपत्कालीन दुरुस्ती, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य इत्यादीसारख्या सुविधा पुरविते .
सेवाशुल्काच्या वसुलीकरिता सुरु करण्यात आलेल्या अभय योजनेनुसार मुंबई मंडळांतर्गत विविध योजनेतील गाळेधारकांकडून दि. १ एप्रिल, १९९८ ते दि. ३१ मार्च, २०२१ या कालावधीची सुधारित दराने येणे असलेली रक्कम व प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम यांचे समायोजन करून दि. ३१ मार्च, २०२१ रोजी येणे असलेली उर्वरित रकमेची मागणी गाळेधारकांकडे केली जाईल. तसेच वसूल होण्यासाठी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून या थकीत सेवाशुल्काच्या वसूल योग्य रकमेवरील दि. १ एप्रिल, १९९८ ते दि. ३१ मार्च, २०२१ या कालावधीचे त्यावर होणारे व्याज माफ करण्यात यावे, असा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला.त्याचबरोबर थकीत सेवाशुल्काची वसूल योग्य रक्कम पुढील ५ वर्षात १० समान हप्त्यात वसूल करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. या वसूल योग्य रकमेचे पाच वर्षात समान १० हप्त्यात वसुलीसाठी वसूल योग्य रकमेचे ८ टक्के वार्षिक व्याज दराने उन्नतीकरण करून दहा हप्ते पाडून गाळेधारकांकडून दर सहा महिन्याला स्वतंत्र बिलाद्वारे वसूल करण्यास मान्यता दिली आहे. जे गाळेधारक सदर थकीत सेवाशुल्काची वसूल योग्य रक्कम प्रथम हप्त्यात एकरकमी भरण्यास तयार आहेत, त्यांना व्याजाचे ८ टक्के दराने उन्नतीकरण न करता थकीत सेवाशुल्काची सुधारित दराने देय मूळ रक्कमेच्या वसुलीस या योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.
सदरील अभय योजना म्हाडाच्या मुंबई शहर व मुंबई उपनगरातील वसाहतींना लागू करण्यात आली असून मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सर्व संबंधितांना नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे ही वाचा- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध लागणार – महापौर