घरठाणेजितेंद्र आव्हाडांच्या बंगल्याबाहेर अभाविपचे आंदोलन

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्याबाहेर अभाविपचे आंदोलन

Subscribe

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ‘नाद’ या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यासाठी आलेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमनेसामने येऊन एकमेकांशी भिडले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने तणाव परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पोलिसांनी मध्यस्थी करून ४० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तेथील वातावरण शांत झाले. यावेळी पोलिसांच्या बघ्या भूमिकेवर अभाविपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

म्हाडाची रविवारी असलेली परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची ओळख झाली आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) सोमवारी ठाण्यातील गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या नाद बंगल्याबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात येऊन थांबले होते. अभाविपच्या पदाधिकार्‍यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलनाच्या तयारीत असतानाच पोलिसांनी देखील या कार्यकर्त्यांना आव्हाडांच्या बंगल्यावर जाण्यापासून विवियाना मॉल जवळच रोखून धरले होते.

- Advertisement -

याचदरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स ओलांडताच दोघेही आमने सामने आले. यावेळी आक्रमक राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना चोपले. तर पोलिसांनी काही पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या गुंडांच्या विरोधात बघ्याची भूमिका घेऊन अभाविप कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. दरम्यान यावेळी अभाविपचे कोकण प्रांत मंत्री अमित ढोमसे, माजी मंत्री प्रेरणा पवार, सहमंत्री नीरज कुरकुटे, यांच्यासह योगेश्वर राज पुरोहित, सूरज लोकरे, शुभम शिंदे, शंकर संकपाळ, प्रणव वांडेकर, ओम मांढरे, धीरज नलावडे, वैष्णव देशमुख यांच्यासह ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

‘चुकीच्या पद्धतीने आंदोलन झाले, त्यांनी आरेला कारे केले तर आम्ही सुध्दा करणार, मंत्रालयात जाऊन निवेदन देणे अपेक्षित होते. परंतु घराबाहेर येऊन आंदोलन करणे अयोग्य आहे. मंत्री आव्हाड यांनी पेपर फुटी प्रकरणी दक्षता घेत, योग्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा होऊन विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही, हे सुध्दा स्पष्ट केले आहे. असे असताना अशा प्रकारे आंदोलन करणे अयोग्य आहे.’
– आनंद परांजपे – शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी, ठाणे

- Advertisement -

‘मुळात पेपर फुटलेच नाहीत. शंका व्यक्त होताच परीक्षा रद्द केली. यांना काय जे पेपर फोडणार होते त्यांची काळजी आहे का? ज्या मंत्र्यांनी तीन दिवस मेहनत घेऊन सर्व रॅकेट उघड केले. मग माझ्या बंगल्यावर मोर्चा का काढण्यात येतो. पेपर फोडणार्‍यांचे आणि यांचे काही लागेबांधे आहेत का, की यातील काही विद्यार्थी यांचेच होते. माझ्या कार्यकर्त्यांनी जे केले ते स्वाभाविक आहे. आपल्या नेत्यांविषयी कार्यकर्त्याला आदर असतो. त्यामुळे आपल्या नेत्यांच्या घरावर कोणी चालून आले तर कार्यकर्ते आक्रमक होणारच. परीक्षा शुल्क परत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची माफी मागितली यात आमचे काय चुकले. राजकीय अभिनिवेश आणण्यापेक्षा चर्चा केली असती तर योग्य ठरले असते’
– डॉ. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

‘विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला असून या सरकारला जाग केव्हा येणार. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान कसे भरून देणार. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सर्व मंत्री आणि विभागांशी समन्वय करून परीक्षेची यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. नाही तर पुन्हा असे प्रकार घडत जाणार आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल. याचा जाब विचारल्याशिवाय विद्यार्थी राहणार नाहीत.’ – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -