दक्षिण मुंबईत असलेल्या मंत्रालयात आज अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने गोंधळ उडाला होता. यावर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या जनसंपर्क आधिकाऱ्यांनी, नरिमन पॉईंट रिसिव्हिंग पॉईंटवर हाय व्होल्टेजमुळे शुक्रवारी(आज) मंत्रालयाचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांची एक टीम तैनात करण्यात आली. त्यानंतर अखेर १२ वाजून दोन मिनिटांनी म्हणजे अवघ्या ७ मिनिटात खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत झाला, असे सांगितले.
नरिमन पॉईंटच्या रिसीव्हिंग पॉईंटवर अतिदाबाच्या व्होल्टेजमुळे ११ वाजून ५५ मिनीटांनी मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित झाली होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. फीडरमधील बिघाडामुळे मंत्रालयासह फोरशोर रोड आणि महर्षि कर्वे रोड परिसरातही सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी विद्युत पुरवठा खंडित झाला. मात्र बेस्टच्या अभियंता आणि तंत्रज्ञानांनी केवळ ७ मिनिटांत वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे झालेला बिघाड अवघ्या काही मिनिटात दूर झाला.
दरम्यान गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत अचानक बत्ती गुल झाली होती. त्यामुळे मुंबई लोकलसह अनेक व्यवहार अचानक ठप्प झाले. या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य आणि केंद्राने समिती स्थापन केली होती. या समितीने मुंबईत झालेल्या खंडित वीजपुरवठ्य़ामागे चीनने सायबर हल्ला केल्याचा स्पष्ट केले. यावर आता तपास सुरु आहे.