नवी दिल्ली / मुंबई – महाराष्ट्र सरकारकडून पुन्हा एकदा महापुरुषांच्या अपमानाची घटना समोर आली आहे. वीर सावरकरांची महाराष्ट्र सदनात जयंती साजरी करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमानाची घटना समोर आली आहे.
वीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सावरकरांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री, राज्यातील खासदार, आणि शिवसेना व भाजप पक्षाचे पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
नवीन संसद भवनाच्या उद्घघाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस दि्ललीत आले होते. यावेळी सर्वांनी एकत्र येत महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या पुतळ्याला नमन केले. यावेळी एक सावरकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे ट्विट करत हा अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा अवमान असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत… pic.twitter.com/da8J6VGGpr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 28, 2023
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, की “महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का?” असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.