ऐन दिवाळीत मुंबई विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा झाल्यांचं चित्र पाहायला मिळतं आहे. दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे एअर इंडियाचे एकूण ४०० कर्मचारी बुधावार रात्रीपासून संपावर गेले आहेत. संपावर गेलेले सर्व कर्मचारी ग्राउंड स्टाफ असल्यामुळे विमानतळावर प्रवाशांचे हाल होत आहेत. विमानात बसण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या ‘चेक इन’साठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इतकंच नाही तर ग्राउंड स्टाफच्या संपाचा परिणाम विमानांच्या उड्डाणावर होत असून, उड्डाणं उशिराने होत आहेत. ग्राउंड स्टाफचा समावेश एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये होतो. विमानात लगेज लोड करणे, विमानाची साफसफाई, प्रवाशांचे चेक इन, कार्गोचं व्यवस्थापन आदी कामं ग्राउंड स्टाफच्य अख्त्यारित येतात. मात्र, ग्राउंड स्टाफमधील तब्बल ४०० कर्मचारी संपावर गेल्यामुळे या सगळ्याच कामांचा खोळंबा होतो आहे. यामुळे ऐन दिवाळीत एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. याशिवाय उड्डाणापूर्वीच्या कामांमध्ये विलंब होत असल्याने उड्डाणांवरही त्याचा परिणाम होतो आहे.
The contractual ground staff of Air India Air Transport Services Limited (AIATSL) at Mumbai airport are on a strike since last night. Several flights from Mumbai have been delayed. More details awaited.
— ANI (@ANI) November 8, 2018
दिवाळीचा बोनस वेळेवर न मिळाल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे. दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या एअर इंडियाच्या ४०० कर्मचाऱ्यांनी बुधवार रात्रीपासूनच संप पुकारला आहे. यामुळे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. चेक इन काउंटर्सवर तसंच लगेज काउंटर्सवर स्टाफच नसल्यामुळे प्रवाशांचे आणि विमानसेवेचे हाल होत आहेत. या प्रकरणामुळे संतप्त झालेले प्रवाशांनी याबाबत तक्रार करत आहेत. मात्र, एअर इंडियाच्या वतीने यावर अद्याप कोणतंच उत्तर देण्यात आलेलं नाही. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
संपकरी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या
▪वर्षानुवर्षे रखडलेली पगारवाढ
▪व्यवस्थापनाद्वारे होणारी सततची त्रासदायक व अपमानास्पद वागणूक
▪बोनस दिला जात नाही
▪वाहतुक सुविधेचा अभाव
▪महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन
▪अवैद्य पद्धतीने कामगारांना कामावरुन काढून टाकणे
▪नविन नियुक्ती न करता निवृत्त झालेल्याच कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाते