राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भावाची साखळी रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या नागरिकांना कामावर ये-जा करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत कर्मचाऱ्यांची मुंबई विमानतळावर कोरोना लसींचा पुरवठा करण्यासाठी मदत लागते परंतु या कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत पोहचण्यास बऱ्याच अडचणी येत आहे. सार्वजनिक वाहतूक ५० टक्के तसेच रेल्वेमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये घेतले जात नाही. मुंबई विमानतळावर काम करणारे बहुतांश कर्मचारी हे विरार, डहाणू, अंबरनाथ,कल्याण,डोंबिवलीहून येतात. या कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास सोयीस्क होतो. परंतु यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना ड्युटीवर पोहचण्यास नाहक त्रास होत आहे.
देशांतर्गत लस पुरवण्यासाठी तसेच देशाबाहेर लस पाठवण्यासाठी विमानाचा वापर केला जात आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवाही सुरु आहे. त्यामुळे विमानतळावर सेवा देण्यासाठी तसेच सामान चढवणे, उतरवणे, तसेच व्यवस्थापनाच्या विभागामध्ये रोज शेकडो कर्मचारी सेवा देतात. या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर पोहचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या कर्मचाऱ्यांना विनाअडथळा ड्युटीवर पोहचण्यासाठी रेल्वे आणि बसने प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.