राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक ईडीच्या कोठडीत असून त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री राजीनामा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजप लावून धरणार आहे. यावर अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार नाही यावर ठाम आहेत. मात्र सभागृहात काय निर्णय घ्यायचा हे सभागृहात ठरेल. कोणाचा राजीनामा स्वीकारायचा हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकार चालवत असताना जे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत त्यासाठी दोन पावले पुढे मागे होतात. मात्र ज्या मुद्यावर सरकार ठाम आहे त्यावर मागे यायचे कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.