कोरोनाच्या संक्रमणामुळे मागच्या पाच महिन्यांपासून मुंबईचा वेग खुंटला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मागच्या पाच महिन्यांपासून वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्केट, दुकाने, मॉल्स बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता मुंबई महानगरपालिकेने एक खुशखबर दिली आहे. इथून पुढे आता अत्यावश्यक सेवेत नसलेले सर्व दुकाने, मार्केट, वाईन्स शॉप्स सकाळी ९ पासून ते रात्री ७ पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने याबाबत सविस्तर आदेश जारी केले आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट वाढत असल्यामुळे राज्यात आतापर्यंत मुंबईत लॉकडाऊन कडक पाळण्यात येत होता. मुंबई महानगरपालिकेने कन्टेनमेंट झोनमध्ये अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यानंतर आता काही प्रमाणात सूट देण्यात आली असून ५ ऑगस्टपासून सर्व प्रकारची दुकाने उघडण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. तसेच यापुढे सम – विषम तत्त्व लागू नसणार आहे. एकूणच मुंबईतील व्यापारी आणि ग्राहकांसाठी ही दिलासादायक अशी बाब आहे.