मुंबई – अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांना मानणारे आहेत. छत्रपतींचा इतिहास त्यांना तारखांनुसार माहिती आहे. त्यांनी त्यावर पुस्तक लिहिले आहे. लवकरच त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. संवेदनशील मनाचे अमित भाई आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजप मुंबईचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी संकलित केलेल्या ‘विचार पुष्प’ पुस्तिकेचे प्रकाशन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
अमित शाहांवर लिहिलेले पुस्तक संग्रह करून ठेवण्यासारखे आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलेही पान उघडले तरी ज्ञानवर्धक अशी पुस्तकाची रचना आहे. अमित शाह यांच्या विचारांचे आणि वाक्याचे संकलन पुस्तकात आहे. सारवर्धक आणि मूल्य वर्धन करणारी ही वाक्ये आहेत. जे पुस्तक वाचतील, त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल. पक्षाची विचारधारा त्यांच्या वाक्यातून स्पष्ट होते. पक्षासाठी समर्पित नेतृत्व अमित शाह भारताला मिळालेले बलशाली नेतृत्त्व आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
LIVE | ‘विचार पुष्प’ या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई https://t.co/qB6tpDUm11
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2022
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्त्वामुळेच २०१४ साली भाजपाला यश मिळालं. म्हणूनच त्यांना राजकारणातील चाणक्य असं म्हटलं जातं. कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यापर्यंत त्यांनी भेटी घेतल्या. गरिबापासून श्रीमतांपर्यंत विचार पोहोचवले. आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. 117 ते 118 जागा लढणाऱ्या भाजपाने 288 जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.