मुंबईः मुंबईला लुटण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सन्मानाने बोलावले आहे, असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी लगावला.
ते म्हणाले, महाराष्ट्र आणि मुंबई हे एक समीकरण आहे. अनेक हुत्माम्यांनी आपले हुत्माम्य मुंबईसाठी दिले आहे. मुंबई केंद्रशासीत करा, असे काही दिवसांपूर्वी बेळगावच्या काही खासदारांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील बराचसा भाग आमच्याकडे असावा, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते. शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले. मुंबईत काहीही शिल्ल्क राहिलेले नाही, असे आमदार मिटकरी यांनी सांगितले.
मुंबईत गुजराती आणि मारवाडी राहिले नाहीत तर मुंबईत मराठी माणूस राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. आता मुंबईत चित्रपटसृष्टी व काही महत्त्वाचे घटक शिल्लक राहिले होते. ते लुटायला कोणीतरी पाहिजे होते. योगी आदित्यनाथ हे याच्यासाठी मुंबईत आले आहेत, असा दावा आमदार मिटकरी यांनी केला.
शिवाजी महाराजांनी सुरत व आग्रावर स्वारी केली होती. आज तेथील लोक फिल्मसिटी लुटायला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबईत कोणताच उद्योग शिल्लक राहू नये यासाठीच योगी आदित्यनाथ यांना शिंदे-फडणवीस सरकारने सन्मानाने बोलावले आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात काही राहणार नाही, अशी व्यवस्था शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे, असा आरोपही आमदार मिटकरी यांनी केला.
योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते येथे रोड शोही करणार आहेत. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. येथे रोड शो करण्याची आवश्यकता काय आहे, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनीही या दौऱ्यावर टीका केली. इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन आपल्या उद्योजकांशी चर्चा करतात. पण आपले सीएम आणि सुपर डीसीएम स्वतःसाठी दिल्लीत आणि गुवाहाटीला जातात. राज्यासाठी जात नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.