मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निडणुकीसाठी परवानगी नाकारली आहे. यानंतर अनिल देशमुख यांनी उच्च् न्यायालयात धाव घेतली असून त्यावर उद्या (10 जून) सकाळी तातडीने सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची आशा कायम आहे.
शुक्रवारी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप समोरा समोर असून एक-एक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला मतदानाची परवानगी मिळावी म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर सत्र न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली. त्यानंतर अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर तातडीने सकाळी सुनावणी घेण्यात येणार आहे.
ईडीचा विरोध –
देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सदर्भात ईडीने कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे सांगत विरोध केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली होती. त्यावर आता अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचीका केली असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
मतदानाचा कोटा झाला कमी –
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठीचा मतांचा कोटा कमी करण्यात आला आहे. हा कोटा आता 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 होता. आताच्या सुधारी कोट्या नुसार उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची गरज आहे. तर याआधी उमेदवाराला निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज होती.
भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस –
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पहायला मिळत आहे. 10 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.