प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या अत्महत्येप्रकरणी रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी पालघर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, अर्णब गोस्वामी यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना आजची रात्र देखील न्यायालयीन कोठडीमध्येच काढावी लागणार आहे. सध्या अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील नगर पालिकेच्या मराठी शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या उपकारागृहात ठेवण्यात आले आहे. आजही त्यांचा मुक्काम त्याच शाळेत असणार आहे.
अर्णब गोस्वामी यांना केलेली अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दोन दिवसांच्या दिवाळीच्या सुट्टीमुळे उच्च न्यायालय कदाचित उपलब्ध नसेल. त्यामुळे विशाषेधिकाराता न्यायालयाने विचार करून अंतरिम दिलासा द्यावा, अशी मागणी अर्णब गोस्वामी यांचे वकील अॅड. आबाद पोंडा यांनी केली होती. मात्र, आम्ही नोटीस जारी करून तक्रारदार आणि राज्य सरकारला उत्तर देण्याची संधी देऊ आणि उद्या जामीन अर्जाविषयी सुनावणी घेऊ, असं सांगत न्यायालयाने जामिनी अर्जावरचा निकाल उद्यापर्यंत पुढे ढकलला.
अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी त्यांच्या राहत्या घरी आई कुमुद नाईक यांच्यासोबत आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी, नितेश सारडा आणि फिरोज शेख यांची नावं टाकली होती. त्या आधारावर अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावर ए समरी घेऊन पोलिसांनी हे प्रकरण बंद केलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा या प्रकरणाची फाईल ओपन करून बुधवारी पालघर पोलिसांनी हाय व्होल्टेज ड्रामामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक केली.