घरमुंबईअष्टपैलू अभिनेते अरुण सरनाईक

अष्टपैलू अभिनेते अरुण सरनाईक

Subscribe

अरुण शंकरराव सरनाईक हे मराठी चित्रपट-अभिनेते होते. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीततज्ज्ञ होते. तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते. गाण्याचे हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळाले. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. संगीताची हीच आवड त्यांना कलाक्षेत्रातील दारे उघडण्यास उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी पदवीही मिळवली. त्यानंतर लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी ‘शाहीर परशुराम’ चित्रपटात त्यांना एक दुय्यम भूमिका दिली.

या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा ‘वरदक्षिणा’ आणि दत्ता धर्माधिकारी यांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा चित्रपटही त्यांना मिळाला. त्यानंतर आलेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाने किमया केली आणि त्यांचा अरुणोदय झाला. त्यांनी भूमिका साकारलेले ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘मुंबईचा जावई’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’ , ‘सिंहासन’ इत्यादी चित्रपट विशेष गाजले. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले तर ‘सुभद्राहरण’ या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला.

- Advertisement -

लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती जब्बार पटेल यांनी केली. चित्रपटात सत्तेच्या राजकारणाचे अनेक पैलू बारकाव्याने टिपले आहेत. यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली! अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेला छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणार्‍या ‘आनंदग्राम’मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथे खर्‍या अर्थाने ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळे, खाऊ देताना त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहायचा. अशा या अष्टपैलू अभिनेत्याचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -