आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आर्यन सोबत असलेल्या अरबाज मर्जंटला एनसीबीच्या ऑफिसमध्ये नेताना किरण गोसावी यांच्यासोबत एनसीबीचे तिसरे पंच मनीष भानुशाली दिसले होते. भाजपचे कार्यकर्ते असलेले मनीष भानुषाली यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे ते मुंबईत येत नसल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. जिवाला धोका असल्याने मनीष भानुशाली यांनी सरकारकडे त्यांच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. संरक्षण मिळत नाही तोवर महाराष्ट्रात येणार नाही असे मनीष भानुशाली यांनी म्हटले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मनीष भानुशाली हे भाजपचे कार्यकर्ते असून त्यांच्या मदतीने एनसीबी ड्रग्ज प्रकरणी धाड टाकली असा आरोप यांनी केला होता.
मला मिळालेली माहिती मी एनसीबीला दिली होती आणि त्यानुसार कारवाई केली. या प्रकरणात मला आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही चौकशीसाठी फोन आलेला नाही. पंच म्हणून सही केल्याने आणि या प्रकरणाची माहिती दिल्याने माझे नाव मीडियासमोर आले आणि त्यामुळे आता माझ्या जिवाला धोका निर्माण झाल्याने मी मुंबईत येत नसल्याचे मनीष भानुशाली यांनी म्हटले आहे. मला अनेकांकडून धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे माझ्यासहीत माझे कुटुंब देखील घाबरले आहेत. आम्हाला जोवर संरक्षण मिळत नाही तोवर आम्ही मुंबईत येणार नसल्याचे मनीष भानुशाली यांनी म्हटले आहे.
पुढे मनीष भानुशाली याने मी सॅम डिसोजाला ड्रग्ज पार्टीत धाड टाकली त्यावेळीस पाहिले होते. तर ड्रग्ज पार्टीत केलेल्या छापेमारिच्या ३-४ दिवस आधी ते किरण गोसावीला भेटले होते. माझ्याकडे ड्रग्ज पार्टीविषयी आलेली माहिती मी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती तिथेच माझा रोल संपला होता. २ ऑक्टोबर नंतर मी कोणालाही भेटलो नाही. त्यामुळे प्रभाकर यांनी केलेल्या २५ कोटींच्या आरोपांविषयी देखील मला काहीही माहिती नसल्याचे मनीष भानुशाली यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर एनसीबीचे पंच किरण गोसावी फरार झाल्याची मला काहीही माहिती नाही. मात्र माझ्यावर आणि भाजपवर करण्यात आलेले आरोप खोटे होते ते सांगण्यासाठी मी माध्यमांसमोर आल्याचे मनीष भानुशाली यांनी म्हटले.
हेही वाचा – Aryan Khan Drugs case: किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार