राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्य सचिव अजोय मेहतांनी मांडलेल्या एका प्रस्तावावरून खडाजंगी झाल्यानंतर आता विरोधकांनी त्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे मुंबईतले आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावर महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यांच्या ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवर एक कविता पोस्ट करत आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना सुनावल्याचं वृत्त ‘आपलं महानगर-माय महानगर’ने प्रसिद्ध केलं होतं. त्यावर आता आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू
मंत्री मोठा की, सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ
शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल.. भिजला तर भिजू दे
मीच भुज"बळ"…मंत्री मंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे
भाजीसह आंबा,कापूस, तूर, केळी उध्वस्त संत्री
महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 10, 2020
‘महत्त्वाचा नाही इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू, मंत्री मोठा की सचिव मोठा ते ठरवा आधी राऊ, शेतकऱ्याचा गहु पावसात भिजेल..भिजला तर भिजू दे, मीच भुज’बळ’..मंत्रीमंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे, भाजीसह आंबा, कापूस, तूर, केळी उद्ध्वस्त संत्री, महाराष्ट्रात प्रोटोकॉलसाठी भांडतात बघा कसे मंत्री!’ असं आशिष शेलार या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांसमोरच अजोय मेहतांची कानउघाडणी!
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याशी निगडित रब्बी गहू खरेदीचा प्रस्ताव मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मंजुरीसाठी मांडला. पण हा खुद्द छगन भुजबळांसाठी धक्का होता. कारण त्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यामुळे या मुद्द्यावरून बैठकीतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांसमोरच कानउघाडणी केली. मुख्यमंत्री या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.