काही दिवसांपूर्वीच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मेट्रो-३ साठी आरेमध्ये कारशेड उभारण्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेची नाराजी देखील ओढवून घेतली होती. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच अश्विनी भिडे यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी भिडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, अखेर त्यांनी ट्वीटरवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे ट्वीटमध्ये?
अश्विनी भिडेंना टॅग करण्यात आलेल्या एका ट्वीटला दिलेल्या उत्तरात त्यांनी या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘तुम्ही तुमचं काम प्रोफेशनली आणि पूर्ण मन लावून करत असता. पण त्याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात असतो. आणि ते तुमच्या नियंत्रणात नसतं. जी लोकं खरोखर त्या विशिष्ट गोष्टीवर काम करत असतात, त्यांनाच कळू शकतं की काय करण्याची आवश्यकता आहे आणि काय केलं गेलं. इतर सर्व गोष्टी या फक्त बघणाऱ्यांचा दृष्टीकोण असतो. शेवटी तुम्ही तुमचं काम करणं महत्त्वाचं असतं’.
U do ur job professionally & with passion. Hw it's interpreted differently by different people is out of ur control. Only those who actually work on it can hv the real understanding of what needs to be done & what was done. Rest all is perception. What matters is you do ur job. https://t.co/bIf2VjmzvI
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 26, 2020
महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर आरेमधील कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. त्याविषयी समिती नेमून त्या समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे. या अहवालानंतरच सरकार आरेमधील कारशेडसंदर्भात निर्णय घेणार आहे.