मुंबईत खूप झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. दररोज १ ते २ हजारांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच आतापर्यंत मुंबईत ३२७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात लॉकडाऊनची भीती वाढली आहे. यादरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोना रुग्णसंख्या वाढत राहिली तर काही दिवसांचा लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल असा इशारा दिला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बातचित करताना अस्लम शेख म्हणाले की, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आम्ही पुन्हा मुंबईत निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सध्या आम्ही जवळून कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मुंबईची लोकसंख्या खूप जास्त आहे. येणाऱ्या दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली तर काही दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
दरम्यान मुंबईत शुक्रवारी ५ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १ रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर ५४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ८५ हजार ११०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७६ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ४९ हजार ७०७ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या मुंबईत १६ हजार ४४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.