आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्यांमुळे आतापर्यंत अनेकदा शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे. आता पुन्हा एकदा बच्चू कडूंमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार असं चित्र दिसतंय. कारण आमदार बच्चू कडूंनी केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेमध्ये उमटले आहेत. याप्रकरणी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना थेट पत्रच धाडलंय. ‘बच्चू कडूंनी आसामच्या विधानसभेत येऊन जाहीर माफी मागावी’. अशा विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांवरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये सोडा, आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं विधान केलं. यानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी करण्यात येत आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पत्र लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे त्यांनी ट्विटरवर सुद्धा शेअर केलंय. “संबंधित आमदाराच्या वक्तव्यामुळे आसामच्या लोकांसह मी अत्यंत निराश झाले आहे. या वक्तव्यातून असे स्पष्ट होते की राज्याच्या संस्कृतीबाबत संबंधित आमदाराचे पुर्वग्रह आणि अज्ञान दिसून येते. संबंधित आमदाराने आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि खेद व्यक्त करणार प्रसिद्धीपत्रक काढावे.”, अशी मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलीय.
CM Dr @himantabiswa has written to Hon’ble Chief Minister of Maharashtra Shri @mieknathshinde expressing anguish over certain comments made by an MLA in Maharashtra Vidhan Sabha recently. pic.twitter.com/kBBUjTMhUt
— Chief Minister Assam (@CMOfficeAssam) March 22, 2023
तसंच “आसामबाबत आमदाराने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही सरकार यावर शांत का?” असा सवाल देखील पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या वादाची आता चांगलीच चर्चा होत आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे.
या वादानंतर आता बच्चू कडू यांनी याबाबत माफी मागितली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. बच्चू कडू म्हणाले, “नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतलं गेलं, तिथं नागालँड म्हणायला हवं होतं. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो.”