मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आलेल्या राणीच्या बागेचे दरवाजे आजपासून म्हणजे तब्बल ११ महिन्यांनी पर्यटकांसाठी उघडण्यात आले आहेत. मात्र कोरोना नसताना जो प्रतिसाद मिळत असे तसा प्रतिसाद लाभला नसला तरी दिवसभरात १ हजार ४१९ पर्यटकांनी राणी बागेत हजेरी लावली. त्यामुळे पालिकेला ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच, राणी बागेत मुक्त वावर असलेल्या मोठ्या पक्षाचा विभाग हा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र आज राणी बागेचे दरवाजे सकाळी उघडण्यापूर्वी पर्यटकांनी गर्दी केली होती.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी राणी बागेत दररोज ४ – ५ हजार पर्यटक भेटी देत असत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पालिका प्रशासनाने, राणी बाग सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही मुंबईत सुरू असल्याने आज पहिल्याच दिवशी राणी बागेत १,४१९ पर्यटकांनी भेट देऊन राणी बागेचा, निसर्गाचा, प्राण्यांच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटला.
मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच पालिकेने १५ मार्चपासून सुरक्षिततेच्या दृष्टीने राणीची बाग बंद केली होती.
राणी बागेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या ४५ लाख रुपये इतक्या उत्पन्नाला पालिकेला मुकावे लागले होते. मात्र आता पालिकेने कोरोनाच्या नियमांचे पालन करीत राणी बागेचे बंद दरवाजे सर्व पर्यटकांसाठी खुले केले आहेत.
गेल्या ११ महिन्यात तब्बल ५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
हेही वाचा – Photo: अखेर राणी बागेचे दरवाजे पर्यटनासाठी उघडले