शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर नेहमीच टीका केली जाते. मात्र आता एकेकाळचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. किती दिवस तळ्यात मळ्यात करायचे याला सीमाअसते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी कधीच कमळाबाईपासून फारकत घेतली असती’,असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणालेत भुजबळ ?
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेनेने आता निर्णय घेतलाच पाहिजे. किती दिवस तळ्यात मळ्यात करावे याचीही सीमा असते. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी कधीच भाजपाशी युती तोडली असती असे त्यांनी सांगितले. असे विधान करुन त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
लोकसभा लढवणार नाही
मुलाखती दरम्यान लोकसभा निवडणुकांविषयी विचारले असता मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय सर्व निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीर मतदारसंघात सर्वेक्षण करुन, परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. त्यामुळे शरद पवारच योग्य निर्णय घेतील, असे देखील म्हणाले.