घरमुंबईशेतकऱ्यांचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : बाळासाहेब थोरात

Subscribe

बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीतही पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी माघार घेतली नाही. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाला पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला, अश्रू धुरांचा वापर केला तरिही शेतकरी आपल्या मागण्यासांठी दटून उभा आहे. या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी महाराष्ट्रातील आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकऱ्यांची ताकद वाढवेल. मोदी सरकार तुमचा सातबारा भांडवलादारांच्या नावावर करण्याचा डाव आखत आहे. अशा शब्दात घणाघाती टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आझाद मैदानात शेतकरी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही पाठिंबा दिला. आजच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते  अशोक ढवळे, नरसय्या आडम, अजित नवले, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, खा. कुमार केतकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, रामकिशन ओझा, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह विविध संघटनांचे नेते व हजारो शेतकरी उपस्थित होते.

- Advertisement -

थोरात पुढे म्हणाले, मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता पाशवी बहुमताच्या आधारावर हे कायदे मंजूर करुन घेतले. संसदेत चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबित करून कायदे मंजूर करुन घेतले. या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असून देशाच्या विविध भागातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या कायद्यात आधारभूत किंमत नाही, बाजार समित्या नष्ट होणार आहेत, रेशन दुकानेही संपुष्टात येणार आहेत. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅली, किसान महाव्हर्च्युअल रॅली, आंदोलने, मोर्चा, राजभवनला घेराव घातला. देशभरातून दोन कोटी शेतकरी, शेतमजूरांच्या सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना देण्यात आले होते. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, त्यासंदर्भात चर्चा सुरु असून लवकरच कायदा केला जाणार आहे, असेही थोरात म्हणाले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -