पुढील आठवड्यापासून राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांची तयारीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्याआधी आठवडाभर एसटी, खासगी बस, दुचाकी-चारचाकी वाहनांनी मुंबई-गोवा महामार्गावरून रायगड, रत्नागिरी, चिपळूण आणि सिंधुदुर्ग येथील मूळगावी जाणार्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वर्दळही वाढते.
त्यातच अवजड वाहनांमुळे चाकरमान्यांना अनेकदा वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतो. यंदा चाकरमानी गावी जाताना वाहतूक कोंडीत अडकू नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 ते 31 ऑगस्टदरम्यान अवजड वाहनांवरील निर्बंध कायम असतील. यासंदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केले आहेत. गणेशभक्तांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी महामार्ग पोलीससुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत.
मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 1915मधील तरतुदींचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी पनवेल ते सिंधुदुर्गवरून रेतीचे ट्रक, ट्रेलरची तसेच वाहनांच्या वाहतुकीबाबत आदेश जारी केले आहेत. ज्या वाहनांची वजन क्षमता 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहने, ज्यामध्ये ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर आदी वाहनांवर ही बंदी लागू असेल.
ही वाहने वगळली
अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार्या वाहनांना वगळण्यात आले आहे.