मुंबई महापालिकेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या गेटबाहेरील सर्व बॅनर्स हटवले आहेत. हे सर्व बॅनर्स शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने शिवसेनेला मोठा दणका दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे. राज्यात काल संध्याकाळी साडे पाच वाजेपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या राष्ट्रपती राजवटीच्याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
कार्यकर्त्यांनी बॅनरमार्फत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची केली होती मागणी
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता २० दिवस होऊन गेले. मात्र, राज्यात अद्यापही कोणत्याच पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही. आता तर राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू झाली आहे. दरम्यान, शिवसेना अजूनही मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. मुख्यमंत्री पदावरुन भाजपसोबत असलेले शिवसेनेचे संबंध ताणले गेले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत मैत्री करुन सत्ता स्थापन करत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या गेटबाहेर काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना बॅनरबाजी करुन मुख्यमंत्री करण्याची विनंती केली होती. यासोबतच आदित्य ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री करण्याची मागणी बॅनरमार्फत करण्यात आली होती. हे सर्व बॅनर मातोश्री बाहेर लावण्यात आली होती. मुंबई महापालिकेने यावर कारवाई करत सर्व बॅनर हटवले आहे.