मुंबईतील वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या पाच डेपोमधील एकुण १७५ बसगाड्या बाहेर पडल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे हाल झाले. सगलग तीन महिने वेतन न दिलेल्या दुसऱ्या दिवशीही कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. एक बस पुरवठादार कंत्राटदाराच्या विरोधात संपाचे हत्यार उपसल्याने सकाळीच मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईतील एकुण पाच डेपोमधून ५०० बस चालकांनी बसेस बाहेर काढल्या नाहीत. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
एम् पी ग्रूपच्या कंत्राट दाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बसगाड्या वेळापत्रकानुसार चालविणे आवश्यक होते. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा वांद्रे आणि विक्रोळी या आगारांमधून आज एकही बस गाडी आतापर्यंत बाहेर पडलेली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाने इतर मार्ग तसेच इतर आगारांमधून स्वतःच्या ८६ बस गाड्या चालवल्या आहेत. सदर कंत्राटदार विरुद्ध कंत्राटातील अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया बेस्ट उपक्रमाचे प्रवक्ते मनोज वराडे यांनी दिली. दंड वसुली, कंत्राट रद्दबातल करणे यापैकी जे कंत्राटामध्ये परिस्थिती अनुरूप मान्यताप्राप्त असेल तशी कारवाई प्रशासन करेल, असेही त्यांनी सांगितले.
बेस्टच्या चालकांना कंत्राटदार कंपनीकडून वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे मुंबईतील पाच डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. बेस्टच्या वतीने हा बसेसचा तुटवडा भरून काढण्यासाठी दुसऱ्या आगाराच्या ठिकाणाहून ८६ बसेस याठिकाणी चालवल्या आहेत. एकाचवेळी ५०० बस चालकांनी संपाचा पवित्रा घेतल्याने त्याचा परिणाम हा १७५ बसेसच्या फेऱ्यांवर झाला. त्यामुळे अनेक मार्गावर प्रवासासाठी बसेस उपलब्ध नव्हत्या अशी परिस्थिती होती. अनेक फीडरच्या मार्गांवरही या संपाचा परिणाम झाला.