नव्या वर्षात मुंबईकरांसाठी एक आंनदाची बातमी आहे. २६ जानेवारी २०२० पासून बहुचर्चित रो-रो सेवा सुरु होणार आहे. ही रोरो बोट भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान धावणार आहे. या बोटीची क्षमता ३०० प्रवासी आणि ५० चारचाकी वाहणाची क्षमता आहे. त्यामुळे मुंबईतून मांडवाला जाणार्या आणि मांडवातून मुंबईत येणार्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
२६ जानेवारीला ठरला रोरोचा मुहूर्त
सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्याचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यामाध्यमातून मुंबईत रो-रो सेवा सुरु होणार होती. त्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. भाऊचा धक्का, मांडवा, नवी मुंबईतील नेरुळ या त्रिकोणात रो-रो सेवा (प्रवासी आणि वाहनांची वाहतूक) सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प सप्टेंबर २०१८ मध्येही सुरू होणार होता. रो-रो बोटी चालविण्यासाठी एका कंपनीशी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाबरोबर करार झाला होता. मात्र, बोर्डाकडून दिलेल्या वेळेत कंपनी रो-रो बोटी आणू न शकल्याने करार रद्द झाला आहे. त्यांनतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे नवीन निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. आता हा न्यायालयीन तिढा सुटलेला असून, २६ जानेवारी २०२० अर्थात नविन वर्षात रोरो सेवा सुरू होणार आहे. जानेवारी महिन्याच्या १६ तारखेला एक अत्याधुनिक रो-रो बोट मुंबईत दाखल होणार आहे. त्यासाठी नव्या कंपनी बरोबर सागरी महामंडळाचा करार पूर्ण झाला आहे. या बोटीची किंमत ५५ कोटी असून ग्रीस देशाच्या या रोरो बोटीची बांधणी केली असल्याची माहिती मेटी टाईम्स बॉर्डाच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतातील शिपिंग क्षेत्रातील एस्कॉयर शिपिंग ऍण्ड ट्रेडिंग कंपनी ही रोरो बोट चालविणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी या कंपनीची असणार आहे. ही रोरो बोट अत्याधुनिक पद्धतीने तयार केली आहे. यात सर्व सुविधा असणार आहे. या रोरो बोटीची प्रवासी क्षमता ३०० असून चार चाकी गाड्यांची क्षमता ५० आहे. लवकरच या बोटीचे प्रवासी भाडे ठरविण्यात येणार आहे.
ग्रीसवरून बोट येण्यास लागणार १६ दिवस
ग्रीसमध्ये या बोटीची बांधणी केली आहे. ही बोट तयार होऊन मुंबईला येण्यास पूर्णपणे सज्ज आहे. ग्रीस वरुन येण्यास या रोरो बोटीला तब्बल १६ दिवस लागणार आहे. ही बोट या महिन्याच्या अखेरीस भारतात येणार आहे. त्यानंतर ही बोट प्रत्यक्षात सुरु होणार आहे, अशी माहिती सागरी महामंडळाच्या अधिकारी यांनी दिली आहे.
हेही वाचा – उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प