महाराष्ट्रात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. नामांतरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप आणि मनसेही आक्रमक झाले आहेत. महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे. तर शिवसेनेकडून आम्ही संभाजीनगर नामांतर करणार आहोत असे वारंवार सांगितले जात आहे मात्र त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नाही असे आरोप सतत शिवसेनेवर केले जात आहे. आज शिवसेने नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्याच मुद्द्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर निषाणा साधला आहे.
स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा “उखाड दिया” ची भाषा..
आणि
आता संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच
काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”!
सत्तेसाठी एवढी लाचारी?
कुठे फेडाल ही पापे सारी?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2021
‘स्वत:च्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा ‘उखाड दिया’ ची भाषा आणि आता संभाजीनगर राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला कोपराला साष्टांग दंडवत! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?’ असे ट्विट करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेची भाषा का बदलली?’,असा सवाल अशिष शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.
‘औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना दुटप्पी वाटते. शिवसेनेसाठी दुटप्पी हा शब्द कमी पडेल. टप्याटप्याने खोटे बोलण्याचे काम शिवसेना करते’, असेही आशिष शेलार यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून औरंगाबादला सेक्युलर म्हणण्यात आले होते. याच विषयाला धरून संजय राऊत यांनी ‘औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे’, असे म्हणतं राऊतांनी सामनाच्या रोखठोक सदरातून काँग्रेसवर टिकास्र सोडले
हेही वाचा – ‘हे वागणं सेक्युलर नव्हे’, राऊतांचे काँग्रेसला खडे बोल