योग्य परवानगी घेऊन महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज भवनावरुन ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानतळावर विमानात गेल्यानंतर त्यांंना उतरवलं गेले. आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलंय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, असे म्हणत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे. तर राज्यपाल हे संविधानिक या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांंच्याशी हे सरकार असे वागत असेल तर अन्य लोकं कशी व्यवस्था ठेवणार? राज्यभर अव्यवस्था निर्माण करायची. कुठलीही व्यवस्था योग्य रीतीने चालू द्यायचीच नाही, अशा पद्धतीचा कारभार पहिल्या दिवसापासून हे महाराष्ट्र विकास आघाडीचे ठाकरे सरकार करत आहे, असेही शेलार यांनी सांगितले.
यासह शेलार असे म्हणाले, ”आम्ही वारंवार पाहिले आहे, केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे आम्हाला नको. अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्व प्रकल्प आम्हाला नकोत. अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विधान सभेने घेतलेल्या निर्णयाला आम्ही तिलांजली देऊ. केंद्र सरकारच्या चौकशीच्या एजन्सीना महाराष्ट्रातील केसेस आम्ही देणार नाही. चौकशीच्या केंद्राच्या रचना योजनांच्या एजन्सिज यांना महाराष्ट्र मध्ये पाय ठेवू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आदेश आम्हाला पाळायचे नाहीत. राज्यपाल महोदयांवर हिन दर्जाची टीकाटिप्पणी आम्ही करू आणि आता तर राज्य सरकारने राज्यपालांचा अपमान करू या पद्धतीचे धोरण घेतलेले दिसतेय. या धोरणामुळे राज्यात असलेल्या सरकारी पक्षांंना राजकीय अभिनश्वेषाचे प्रेम जरूर वाटत असेल पण त्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशभरामध्ये या ठाकरे सरकारने केली आहे.”
विशेषता ज्या महाराष्ट्रात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या बाबासाहेबांनी प्रथा-परंपरा संविधान, नियम नियमावली संसदीय लोकशाही दिली. त्या महाराष्ट्राने या सगळ्या संविधानिक पदाचा अवमान करणे म्हणजे बाबासाहेबांच्या मार्गावर आम्ही चालायला तयार होत नाही, हे दाखवण्यात येते आहे. अपमान केला जातोय. देशभर महाराष्ट्राची बदनामी केली जातेय, असा टोलाही ठाकरे सरकारवर लगावला आहे.