सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे यांची नियुक्ती यासह परमबीर सिंह यांनी लिहिलेलं पत्र यासर्व घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. यावेळी लोकसभेत भाजप आणि शिवसेना खासदारांमध्ये जोरदार खजाजंगी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. रविवारी लोकसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रावरून जोरदार हल्लाबोल झाला. परमबीर सिंह यांच्या पत्राच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेत. परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केलेले आरोप हे अत्यंत गंभीर असून राज्यात कोणताही कायदा पाळला जात नाही तसेच, सुव्यवस्था नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, यासाठी भाजपाकडून मागणी करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्राच्या मुद्द्यांवरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्यासह पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा याच मुद्द्यावरून आक्रमक झाले.
महाराष्ट्रात पोलीस खंडणी मागत आहे – गिरीश बापट
लोकसभेचे कामकाज सुरू असताना भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवट लागू करा, अशी मागणी देखील केली. यावेळी ते असेही म्हणाले, ‘या महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते मात्र आता हे सरकार खंडणी मागत आहे. सरकार भ्रष्ट होत चाललंय. महाराष्ट्रात कोणताही कायदा आणि सुव्यवस्था राहिली नसून धिंडवडे निघाले आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांकडूनच पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्याचे आशीर्वाद असल्याने जनतेने कुणाकडे पाहायचे’,असे देखील ते म्हणाले.
तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल – नवनीत राणा
जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होतो. जो व्यक्तीला ६० दिवसांचा तुरूंगवास होतो, त्याला पुन्हा सेवेत कोणी कार्यरत केलं? कोणी घेतलं? याची त्वरीत चौकशी करण्यात यावी , अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. यासह सचिन वाझेंच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक होत त्यांनी अनेक सवालही यावेळी उपस्थितीत केले. ‘भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यास नकार दिला होता. यावेळी शिवसेनेकडून वाझेंसाठी फडणवीसांवर दबाव देखील टाकण्यात आला. जर राज्यात खंडणी घेण्याते असे प्रकार सुरूच राहिले तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल’
शिवसेनेला मिर्ची लागण्याचं कारण काय? – पुनम महाजन
राज्यातील ठाकरे सरकार हे तीन चाकाचं सरकार आहे. या सरकारचा एकमेकांशी ताळमेळ नाही. एका पोलीस अधिकाऱ्याला १०० कोटी वसूल करण्याचा टार्गेट दिला जातंय तर पाच वर्षात सहा हजार कोटी वसूल केली जातील. एका व्यक्तीला एवढा टार्गेट तर बाकीच्यांना किती असेल, असा सवाल भाजप नेत्या पूनम महाजन यांनी याप्रकरणात राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना शिवसेनेला मिर्ची लागण्याचं कारण काय? असे म्हणत त्यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडले.