पालघरजवळ बोईसरमध्ये एका रसायनाच्या कंपनीमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपासच्या मोठ्या परिसरात भूकंपसदृश धक्के बसल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. तारापूरच्या एमआयडीसीमधील तारा नायट्रेट या कंपनीत रसायनाचा भीषण स्फोट झाला. या अपघातात ३ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे या स्फोटामुळे आसपासच्या २ ते ३ कारखान्यांना देखील आग लागल्याचं म्हटलं जात आहे. कोलवडेजवळच्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये तारा नायट्रेट कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांच्यासह २ कामगार मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अनेक कामगार अजूनही दुर्घटनास्थळी आत अडकल्याची माहिती आहे.
दरम्यान, या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत सरकारच्या वतीने घोषित करण्यात आले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला दिले आहेत. बचावकार्यामध्ये एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली, तसेच यामधील बचाव कार्याला आणि जखमींच्या उपचारांना प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.