पश्चिम उपनगरातील पोईसर नदीला (Poisar River) पूर आल्यास निर्माण होणाऱ्या धोक्याचा प्रभाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका नदीकिनारी संरक्षक भिंत उभारणार आहे. मात्र या संरक्षक भिंतीच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या 16 बांधकामांवर मुंबई महापालिकेने कारवाई करून ती जमीनदोस्त केली.
मुंबई महापालिका (bmc) हद्दीत मिठी, दहिसर, वाकोला, पोयसर, वालभट या नद्या आहेत. मुंबईत (Mumbai) समुद्राला मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास नद्या, नाले ओसंडून वाहतात. नद्यांची पातळी वाढून पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नद्यांच्या किनारी असलेल्या झोपडपट्टीला, बांधकामांना धोका निर्माण होतो. झोपडपट्टीत नद्यांचे पाणी शिरून मोठी वित्तीय हानी होते.
26 जुलै 2005 ला मुंबईत नाले तुंबले व नद्यांना पूर आला होता. त्यावेळी मुंबईची तुंबई झाली व मोठी वित्तीय आणि जीवित हानी झाली होती. मात्र त्यानंतर खडबडून जागृत झालेल्या मुंबई महापालिकेने (mumbai bmc) 26 जुलैची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून विविध उपाययोजना केल्या. परिणामी आजपर्यंत 26 जुलै सारखी घटना पुन्हा घडली नाही. मात्र आज 17 वर्षे होत आली तरी पालिका आजही त्या उपाययोजना शंभर टक्के पूर्ण करू शकलेली नाही.
पोयसर नदीला अतिवृष्टी होऊन पूर
आजही नद्यांची सफाई, खोलीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंत उभारणे आदी कामे सुरूच आहेत. याच कामाच्या अंतर्गत कांदिवली येथील भागातून वाहणाऱ्या पोयसर नदीला अतिवृष्टी होऊन पूर आल्यास नजीकच्या मंगूभाई दत्ताजी पुलाच्या जवळ असणा-या लालजी पाडा परिसराला मोठा धोका उदभवू शकतो. त्यामुळे पालिकेला पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे वाटते. त्यासाठी सदर परिसरातील सुमारे 130 बांधकामे / झोपड्या प्रभावीत होणार आहेत. तथापि, येत्या पावसाळ्यापूर्वी ज्या भागात भिंत बांधणे प्राधान्यक्रमानुसार आत्यंतिक गरजेचे आहे, अशा भागातील 29 बांधकामे पहिल्या टप्प्यात हटविण्यात येणार आहेत. या 29 बांधकामांपैकी 16 बांधकामे शुक्रवारी धडक कारवाई करून हटविण्यात आली आहेत. तर उर्वरित 13 बांधकामे देखील पाठोपाठ हटविण्यात येणार आहेत. ही बांधकामे हटविल्यानंतर लगोलग संरक्षक भिंतीचे बांधकाम देखील महानगरपालिकेद्वारे सुरु करण्यात येणार आहे.
हेही वाचा – मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचेल – आदित्य ठाकरे
महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार ‘परिमंडळ – 7’ च्या उप आयुक्त डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या स्तरावर सातत्याने समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येऊन संबंधितांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कारवाईदरम्यान 16 बांधकामे / झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान स्थानिकांचे चांगले सहकार्य लाभले, अशी माहिती उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे.
आज करण्यात आलेल्या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील 20 कर्मचारी, महापालिकेचे 75 कामगार – कर्मचारी – अधिकारी उपस्थित होते. तसेच जे. सी. बी., पोकलेन यासारख्या यंत्रसामुग्रीचा वापरही या कारवाईदरम्यान करण्यात आला, अशी माहिती ‘आर/दक्षिण’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा – यंदा १३ जूनपासून शाळेची घंटा वाजणार, शिक्षण विभागाने जाहीर केले वेळापत्रक