गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल आता सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होणार आहे. येत्या नव्या वर्षात लोकलबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. मुंबईची जीवनवाहिनी कधी सुरू होणार?, असा सर्वच मुंबईकरांना प्रश्न पडला असताना आयुक्त चहल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘मुंबईच्या लोकलबाबत ३१ डिसेंबरनंतरच निर्णय घेतला जाणार’, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता मार्चच्या अखेरीस लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सुरु करण्यात आली. दरम्यान, पुढील टप्प्यात सर्वसामान्य महिलांनाकरता लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्याप सर्वांसाठी लोकल सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकल सर्वांसाठी केव्हा सुरू होणार, असा एकच प्रश्न सर्व प्रवाशांना सतातवत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी येत्या नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अन्यथा कर्फ्यू लावण्यात येईल
मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील कमी झाली आहे. पण, असे असेल तरीही मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना इशारा दिला आहे. मुंबईत जरी रुग्ण कमी होतोना दिसत असेल तरी कोरोनाचा धोका हा अद्यापही कायम आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संदर्भात नियमाचे पालन केले नाहीतर मुंबईत रात्रीचा कर्फ्यू लावण्यात येईल, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल म्हणाले आहेत.
हेही वाचा – नियम पाळा, नाहीतर मुंबईत नाईट कर्फ्यू; आयुक्तांचा इशारा