मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. त्याआधी राज्याचे पर्यटनमंत्री, युवासेना प्रमुख आणि शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्या आदित्य ठाकरेंनी नागरी कामांच्या शुभारंभांचा धुमधडाका सुरु केला आहे. शनिवारी ५ तासात १० कार्यक्रमांचं उद्घाटन आदित्य ठाकरे करणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पालिकेवरील सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना देखील मैदानात उतरली आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगरपालिकेवर असलेली पकड यंदाच्या निवडणुकीनंतरही कायम राहावी, या उद्देशाने शिवसेनेने तयारी सुरू केली असून त्यासाठी ‘मिशन १५०’ निश्चित केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जबाबदारी आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर आहे.
आदित्य यांनी पक्षाचे नगरसेवक, आमदार, विभागप्रमुख यांच्या बैठकांचा सपाटा लावलाय. महापालिकेच्या विविध वॉर्डांमध्ये नगरसेवकांच्या काय अडचणी आहेत, हे समजून घेत आहेत. याशिवाय विभागप्रमुखांच्या संपर्कात राहून आमदारांच्या अडचणी समजून घेण्यावर भर देतानाच त्यांनी संघटनेच्या मोर्चेबांधणीलाही महत्त्व दिलं आहे. निवडणुका आल्या की नाराजी वाढते, हे लक्षात घेऊन आधीपासूनच संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर आवश्यक भागांमध्ये महापालिका, आमदार, खासदार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतलाय. अशातच आदित्य ठाकरेंनी नागरी कामांच्या शुभरंभांचा धमधडाका सुरु केला आहे. शनिवारी ५ तासात १० कार्यक्रमांचं उद्घाटन आदित्य ठाकरे करणार आहेत.