महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधानंतरही अखेर महापालिका प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबबतचे परिपत्रक जारी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसातील आठवड्यातील वेळ तसेच पूर्वी घेण्यात येणाऱ्या रजा आता कमी होणार असल्याने या निर्णयाला कर्मचाऱ्यांची पसंती नसल्याचे दिसत होते. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत महापलिकेकडून अखेर याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.
राज्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला आहे. मात्र महापालिकेच्या परिपत्रक जारी करण्या आधी; विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महापौर,गटनेते तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेवून ही वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहावाजेपर्यंत करण्याची मागणी केली होती, त्यानुसार कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेत पालिकेने सकाळी १० ते ६ पर्यंतची वेळ निश्चित्त केल्याचे दिसत आहे.
काय आहे परिपत्रकात?
महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार प्रशासकीय कार्यालयात यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा फायदा मिळत होता अशाच कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार सुट्टी राहील असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यालयांसह, महापालिका मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारांच्या कामाची वेळ १० ते ६ असणार आहे. तर कार्यालयातले शिपाई, कामगारांना ९.३० ते ६.३० कामाची वेळ ठरवण्यात आली आहे. या पत्रकात कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ देखील ठरवण्यात आली असून दुपारी १ ते २ या वेळेत अर्धा तासाची वेळ भोजनासाठी असेल. कर्मचारांचा अधिक वेळ कामात खर्ची व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांना एका महिन्यात केवळ दोन वेळा उशीरा येण्याची मुभा देण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांसाठी लागू नसणार आठवडा?
महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा निश्चित करण्याबाबत हे परिपत्रक जारी करण्याआधी प्रशासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली होती. पालिकेकडून आता हे परिपत्रक जारी केल्यानंतर याला कर्मचाऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.