राज्यात करोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण वाढल्यामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन काम करता यावं, यासाठी राज्य सरकारने सध्या सुरू असलेलं अधिवेशन शनिवारपर्यंत गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला प्रस्ताव आज विधानसभेमध्ये मांडण्यात आला. या प्रस्तावाला विरोधी पक्षांसह सर्वांनीच अनुमोदन दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधकांकडे आजचा दिवस धरून फक्त तीनच दिवस शिल्लक उरले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचं कामकाज जलद गतीने करण्याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचा कल राहील.
वास्तविक सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं. मात्र, आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन करोनासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी मतदारसंघात हजर राहणं आवश्यक आहे. शिवाय, शक्य तितक्या लवकर ही पावलं उचलणं गरजेचं असल्यामुळे अधिवेशन लवकर संपवून आमदारांना त्यांच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.