भायखळा कारागृहातील अन्नधान्यात दोष आढळला नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासन या विभागातून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, कारागृहातील पाण्याच्या नमुन्यातही दोष नसल्याचं याआधीच पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, कैद्यांना विषबाधा नेमकी का झाली? याचा उलगडा अजून झालेला नाही. कैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील अन्न खाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. शुक्रवार सकाळपासून सुमारे ८६ महिला कैद्यांना विषबाधा झाली असून अद्याप त्यापैकी ७ जणांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात चार महिला कैदी, दोन पुरुष कैदी आणि एका १ वर्षाच्या लहानग्याचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.
जेवणाचा दोष नाही
८० पेक्षा जास्त कैद्यांना विषबाधा झाल्यानंतर एफडीए इन्स्पेक्टर यांनी शुक्रवारी भायखळा कारागृहाची भेट घेतली. कैद्यांना पोटात मळमळणे, डायरिया आणि उलट्या अशा प्रकारचे आजार उद्भवले. त्यामुळे त्यांना सरकारी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याविषयी एफडीएचे सहाय्यक आयुक्त डॉ. शैलेश आढाव यांनी सांगितलं की, मंगळवारी कारागृहातील अन्नधान्यांच्या तपासाअंती त्यात कुठलाही दोष आढळून आला नाही. आम्हांला त्या दिवशी शिजवलेल्या अन्नाचे नमुने मिळाले नाहीत. एफडीएने भात, गहू, सोयाबिन तेल, डाळ आणि पोहे याचे नमुने गोळा केले होते. पण, त्यात एकाही धान्यात दोष आढळलेला नाही. कारागृहात जवळपास ७०० कैदी आहेत. जर जेवणात दोष आढळला असता तर सर्वांनाच त्रास झाला असता. भायखळा कारागृहातील जवळपास ८७ कैद्यांना शुक्रवारी विषबाधा झाली होती. त्यानंतर त्यांना सकाळीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातील ७९ कैद्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.