आटगाव रेल्वे स्टेशनजवळ आज सकाळी लोकलचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने आसनगाव ते कसारा दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आज सकाळी ७ वाजून २८ मिनिटाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन जवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला. ही लोकल आटगावकडे येत होती. लोकलचा डबा रेल्वे रुळावर आल्याने आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प झाली आहे.
Trolley re-railed at 10.38am. @Central_Railway
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) September 19, 2020
दरम्यान ट्रॉली रिरेल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे. लोकल ट्रेन आटगाव स्थानकात येत असताना ही घटना घडली. पण घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकलच्या डब्यात ८ ते ९ प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लोकलचा डबा रेल्वे रुळावरून दूर करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.तसेच प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.दरम्यान, करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांनाच रेल्वेतून प्रवासास मुभा देण्यात आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादित प्रमाणात चालवण्यात येत आहेत. त्यामुळे लोकल,बस आणि एसटीमध्ये नागरिकांची तुफान गर्दी असते. आता कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक बंद पडल्याने मुंबईला कामासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक चाकरमान्यांनी मुंबईला जाण्यासाठी थेट एसटी आगार गाठल्याने एसटीतही प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.