मराठा आरक्षणाच्या निमित्ताने भाजपने बॅकस्टेज राजकारण सुरू केले आहे. फक्त उसकवण्याचे काम यांच्याकडून सुरू आहे. भाजपचे जे खासदार सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर बोलत आहेत, त्यांचा काय अभ्यास आहे ? असा सवाल राज्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. भाजप फक्त आता या विषयावर राजकारण करत आहे. भाजपचे जे लोक नेतृत्व करत आहेत, त्यांनी राजकारण न करता ही गोष्ट समजून घ्यायला हवी. उगाच भांडण लावण्याचे काम करू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सर्व पक्षांची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. पण त्याचवेळी ओबीसी समाजाचे, भटक्या जमातींना, अनुसुचित जाती आणि जमाती यांना जे आरक्षण मिळाले त्याची कारवाई थांबवा अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. खाजगी संस्थांमध्येही हे आरक्षण थांबवावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण काढून टाकण्यात यावे अशी अशा याचिकांसाठी वकिल देण्याची मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. महाज्योती, शिष्यवृत्ती, वसतीगृहासाठी पैसे आम्ही ओबीसी समाजासाठी मागत आहोत. आधार, घरकुल योजना अंमलात आणली जात नाही हीदेखील मागणी आम्ही केली आहे, असे त्यांनी सांगितले.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हव ही आमची भूमिका आहे. सर्वच पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी भूमिका त्यांनी मांडली. ओबीसी समाजाला फार पूर्वीच आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणावरून हा वाद उसकवून भांडण काढण्याची गरज नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी केवळ मंडल आयोगाने लागू केलेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली. त्यावेळी पवार साहेबांनी मराठा आरक्षण नाकारल्याची बाबच नव्हती. आयोगामार्फत लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी त्यांनी यावेळी केली. म्हणून पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला विरोध केला ही गोष्ट चुकीची आहे असा खुलासा त्यांनी केला. मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत चांगल्या वकिलांची फौज तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माझ्या शुभेच्छा आणि प्राथर्ना असल्याचे त्यांनी सांगितले.