घरमुंबईराज्यातील किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन; दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन

राज्यातील किल्ल्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन; दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Subscribe

मुख्यमंत्री संकल्प कक्षास सूचना पाठविण्याचे आवाहन

राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत आहेत, अशी माहिती देत राज्यातील दूर्गप्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना आणि प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. ठाकरे यांनी आज राज्यातील २५० दूर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आणि त्यांच्या सूचना ऐकल्या. त्यावेळी ठाकरे यांनी किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे आणि कामाला सुरुवात करावी, असे दुर्गप्रेमीना केले.

दूर्गप्रेमीना दूर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या [email protected] या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठवाव्यात. दूर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो, पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे. किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य सरकार यामध्ये पूर्ण सहकार्य करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. गड किल्याचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागा असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गड किल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गड किल्ल्यांची महती पोहचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडीओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहचेल असे पाहिले पाहिजे. गड किल्यांच्या पायथ्याशी परिसरात त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र आणि राज्याकडील किल्ल्यांची वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

यावेळी दूर्गप्रेमींनी आपल्या सूचना मांडताना दुर्गांचे राज्य सरकारने अधिग्रहण करावे, पर्यटन, पुरातत्व, वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा, दुर्ग संवर्धन खाते सुरु करावे, दुर्गांसाठी सहाय्यता निधी सुरु करावा, अशा अनेक सूचना केल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक आणि दूर्गप्रेमींनी आपले विचार प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.


मुख्यमंत्रीपदाबाबत वाटाघाटी नाही, ५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -