काही दिवसांपूर्वी वालधुनी नदीमध्ये सोडलेल्या विषारी रसायनामुळे नदीपात्राजवळील नागरिकांना डोळ्यांना जळजळ, उलट्या, डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. हे विषारी रसायन एरोमॅटिक कंपनीने नदीत सोडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या कंपनीला एमआयडीसीने नोटीस बजावली आहे. उल्हासनगर शहरात राहणार्या ओ. टी. सेक्शन परिसरात वालधुनी नदीकाठी असणार्या हजारो नागरिकांना महिन्यातून एक किंवा दोन वेळा मोठ्या प्रमाणात जल आणि वायू प्रदूषणाचा त्रास जाणवतो.
नदीपात्रात सोडलेले रसायन आणि त्यानंतर हवेत होणारे प्रदूषण यामुळे हवेत भयंकर दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. गेल्या आठवड्यातदेखील ही समस्या उद्भवली होती. तेव्हा वालधुनी जल बिरदारी या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष शशीकांत दायमा आणि त्यांच्या सहकार्यांनी नेमक्या कोणत्या कंपनीतून विषारी रसायन प्रवाहीत होत आहे, याचा शोध घेतला. तेव्हा अंबरनाथ पश्चिमेतील कल्याण-कर्जत महामार्ग या रस्त्यालगत असल्याने एरोमॅटिक या कंपनीतून सांडपाण्याद्वारे रासायनिक द्रव्ये वालधुनी नदीत येऊन मिसळत असल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात जल बिरदारी संघटनेने एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकार्यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली.
कंपनी आपली विषारी रसायने उघड्या मैदानात अथवा वालधुनी नदीत सोडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हे धोकादायक कृत्य त्वरीत बंद करावे. कंपनीसाठी आपले टाकाऊ रासायनिक द्रव्य अंबरनाथ केमिकल मॅनीफॅक्चर असोसिएशनच्या सेफ्टी (कॉमन एफ्यूलंट ट्रिटमेंट प्लॅन्ट) या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केलेली असताना अशा प्रकारचे गैरकृत्य होत आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करावी, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.