घरमुंबईरुग्णवाहिकांच्या भोंग्याऐवजी आता वेगळेच भोंगे वाजतायत, उद्धव ठाकरेंची भाजप-मनसेवर टीकेची झोड

रुग्णवाहिकांच्या भोंग्याऐवजी आता वेगळेच भोंगे वाजतायत, उद्धव ठाकरेंची भाजप-मनसेवर टीकेची झोड

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करून कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करून कोविड नियंत्रणात आणला त्या ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल - कोविड वॉरियर’ या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडली जाईल.

कोरोनाच्या संकटकाळात याच दिवसांमध्ये राज्यातील मंदिरे आणि प्रार्थना स्थळे बंद होती. त्यावेळी केवळ रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते, परंतु आता वेगळेच भोंगे वाजत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप, मनसे आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिनाझ मर्चंट लिखित ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाकाळातील आठवणींना उजाळा दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करून कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करून कोविड नियंत्रणात आणला त्या ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडली जाईल. कोविडचा काळ हा कसोटीचा काळ होता. कोविडशी लढण्याचा जगाला अनुभव नव्हता. कोविडवर उपचार नव्हता तरी त्याचे व्यवस्थापन करू शकत होतो, अशी परिस्थिती होती. मार्च २०२० मध्ये कोविड केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि वांद्रे कुर्ला संकुलात देशातील पहिले जम्बो कोविड रुग्णालय केवळ 15 दिवसांत महानगरपालिकेने सुरू केले, अजूनही हे रुग्णालय तसेच ठेवले असून या ठिकाणी कायमस्वरुपी पाणीपुरवठा आणि मलनिःसारणाची सुविधा निर्माण केली आहे, विविध उपाययोजना करणे हे एक सांघिक काम होते, या संपूर्ण अधिकारी-कर्मचार्‍यांवर विश्वास टाकून त्यांच्यात हिंमत जागवली, त्यावेळी या सर्वांनी अतिशय अवघड काम केले. एक कॅप्टन म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे काम आपण केले, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यासह एक-एक गोष्टी शिकत आणि त्या करीत गेलो. लॉकडाऊनच्या काळात मजूर घरी जाण्यासाठी पायी निघाले, रस्त्याने जाणार्‍या या मजुरांना अन्नाची पाकिटे दिली. केंद्राकडे गाड्यांची त्यावेळी मागणी केली, गाड्यांना परवानगी देण्याची मागणी केली, अतिशय झोप उडवणारा हा काळ होता. अर्थचक्र पूर्ववत करण्यासारखे अनेक प्रश्न होते, ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता, अशावेळी ऑक्सिजनच्याअभावी एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घेतली आणि ऐन ऑक्सिजनच्या टंचाईत दीडशे रुग्णांना स्थलांतरित केले त्यामुळे मोठी हानी आपण टाळू शकलो असे सांगून कोविडकाळात ज्या काही उपाययोजना आपण केल्या त्या माहितीचे संकलन होणेदेखील आवश्यक होते, त्या सर्व गोष्टींची माहिती या पुस्तकात आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

धारावीमध्ये कोविड नियंत्रणात आणला त्याचे जगभरात कौतुक झाले. रुग्णालये, खाटांचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका अशा अनेक उपाययोजना केल्या. बोलणे आणि कृती यातील अंतर कमी केले म्हणून कोविडची यशोगाथा आपण या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडू शकलो असे सांगून कोविडकाळात महापालिका, बेस्ट आणि सर्व यंत्रणांनी न खचता केलेल्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले आणि हे यश कोविड योद्ध्यांना अर्पण केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -