पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा दिलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे अजुनही मंत्रीमंडळात आहेत का ? त्यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे ? त्यांचे सध्याचे अस्तित्व काय आहे ? विरोधकांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त राजीनामा घेऊन आपल्याकडे ठेवला आहे का ? अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याचा सरकारचा डाव आहे का ? याची आता शंका येऊ लागल्याचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री संजय राठोड यांना शेवटच्या दिवशी मंत्री ठेवण्याचा हा पूर्वनियोजित डाव असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत दरेकर म्हणाले की महाविकास आघाडी सरकार चालवताना बाळासाहेबांचा ठाकरी बाणा गेला कुठे असा सवाल त्यांनी केला आहे. तर भाजप नते अतुळ भातखळकर यांनीही मुख्यमंत्री ढळढळीत खोट बोलत असल्याचा आरोप केला आहे.
संजय राठोड अजूनही मुख्यमंत्र्यांच्या हृदयात. राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांच्या खिशात (बहुदा फ्रेम करायला दिला असावा). राठोडने बंगला, गाडी सोडलेली नाही.
राजीनामा राज्यपालांकडे कधी पाठवणार? उद्धवजी खेळ पुरे, आता तरी न्याय करा, राठोडला अटक करा.@OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 3, 2021
वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा लिहून दिला होता. पण हा राजीनामा देऊन आता तीन दिवस उलटलेले असतानाही हा राजीनामा राज्यपालांकडे पोहचलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला नाही. त्यामुळेच आता विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरण्याचा इशारा दिला आहे. खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा राज्यपालांकडून पाठवलाच नसल्याचे सांगत तो फ्रेमच करून ठेवला असल्याची टीका केली होती. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हा राजीनाम्याचा मुद्दा गाजणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा फ्रेम करून ठेवण्यासाठी घेतला नाही असे स्पष्ट केले होते.
राजीनामा दिल्यानंतर सरकारकडून राज्यपालांकडे जातो. त्यानंतरच तो राजीनामा अधिकृतपणे मंजुर झाल्याचे मानण्यात येते. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी स्विकारलेला राजीनामा हा राज्यपालांकडे पाठवणे गरजेचे होते. पण तीन दिवस उलटूनही हा राजीनामा राज्यपालांकडे पोहचलेला नाही. राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांचे राजीनामा फ्रेम करून ठेवायला घेतला नाही हे विधान एकलेले आहे. म्हणूनच बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्याची आठवण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून दिली आहे. बाळासाहेबांनी पोटात एक आणि ओठावर एक असे कधीच केले नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्याकडूनही असाच ठाकरी बाणा अपेक्षित होता. पण मुख्यमंत्र्यांना सध्या केवळ महाविकास आघाडीला राज्य सरकार चालवण्यात रस आहे. पण राज्यातील जनतेसमोर चांगली प्रतिमा ठेवण्याचा मानस सरकारचा नाहीए. जर प्रक्रिया पुर्ण करायची असती तर एव्हाना राजीनामा राज्यपालांकडे गेला असता. म्हणूनच जर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी राज्यपालांकडे हा राजीनामा जाणे गरजेचे आहे. संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडे गेलेला नाही म्हणजे हा फक्त अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांना शांत करण्याचा डाव आहे. हा मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारणार आहोत, असे दरेकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याच पत्र
माननीय मुख्यमंत्री,
उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
अत्यंत व्यथित अंत:करणाने हे पत्र मी आपणास लिहित आहे. आपण माझ्या भावना समजून घ्याल, असा विश्वास आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या भोवती दिवंगत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे वादळ घोंगावत आहे. पूजा चव्हाण यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूची निपक्षपातीपणे तपास व्हावा व सत्य बाहेर यावे अशी माझी ठाम भूमिका आहे. या सर्व प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राज्यातील विरोध पक्ष माझ्याविरोधात बेछूटपणे आरोप करत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी ही मोहीम चालवत आहे. या संपुर्ण प्रकरणात दिवंगत पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. महाराष्ट्रात अशा खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते. मी आपल्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरीही, मी एक कडवट शिवसैनिक आहे. आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रीमंडळात काम दिले यासाठी मी आपला आभारी आहे. पूजा चव्हाण प्रकरणात सत्य बाहेर येईपर्यंत मी मंत्री म्हणून राहणे हे योग्य वाटत नाही. म्हणून मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.
आपला नम्र
संजय राठोड