राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भात कोरोनाचा उद्रेक झाल आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्याची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनच्या निर्णय येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाऊनच्या अनुषंगाने चित्रपट निर्माते आणि विरोधी पक्षांच्या प्रमुखांशी बैठका घेत आहेत. यादरम्यान सर्वांचे मत जाणून घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले होते.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत. परंतु लॉकडाऊनला विरोधी पक्ष भाजप, मनसे आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांशी आणि काही समित्यांच्या प्रमुखांशी बैठक घेतली आहे. मनसेनेही राज्यात लॉकडाऊन न करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करुन लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं असे ट्विट करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं @CMOMaharashtra
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 4, 2021
पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सकाळी दादर येथील भाजी मार्केटला भेट दिली. यावेळी दादर मार्केटमधील दृश्य पाहून त्यांनी मुंबईतील कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्याचे सांगितले. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर बेड्स कमी पडतील, अशी भिती देखील व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांनी नियमांचे पालन करणे फार गरजेचे आहे. अन्यथा याबाबत आजच निर्णय घेण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.