घरमुंबईमुंबईतील दुकाने,हॉटेल्स,केमिस्ट रात्रीचीही खुली ठेवा! - काँग्रेस

मुंबईतील दुकाने,हॉटेल्स,केमिस्ट रात्रीचीही खुली ठेवा! – काँग्रेस

Subscribe

काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. मुंबईतील विविध प्रश्नांवर तब्बल दोन तास आयुक्तांसोबत चर्चा केली.

मुंबईत पुन्हा एकदा न्यूयॉर्कच्या धर्तीवर दुकाने २४ तास अर्थात रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. शिवसेना, भाजप पाठोपाठ आता काँग्रेसनेही ही मागणी केली आहे. मुंबईतही दुकाने, हॉटेल्स, केमिस्ट या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि आस्थापने ही २४ तास खुल्या ठेवल्या जाव्यात, अशी सूचना विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन केली. त्यावर पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. मुंबईतील विविध विकास कामांच्या प्रश्नी काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २४ नगरसेवकांनी मंगळवारी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत रस्ते, पाणी, शौचालये यांसह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

यामुळे येणार कायदा आणि सुव्यवस्थेला कोणातीही बाधा येणार नाही

या बैठकीत काँग्रेसतर्फे मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून हे शहर २४ तास जागे असते. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवनावश्यक बाबींची नागरिकांना आवश्कता असते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल्स, केमिस्ट, दुधविक्री केंद्रे यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दिवस-रात्र सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. हॉटेल्स आणि दुकाने रात्रभर खुली राहिली तर मुंबईकरांची रात्री खाण्याचीही सोय होईल. कायदा आणि सुव्यवस्थेला यामुळे कोणतीही बाधा येणार नाही, यासाठी पोलीस आणि पालिका कायद्याचा विचार देखील केला जावा, असे रवी राजा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यापूर्वी अशीच भूमिका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अमित साटम यांनी मांडली होती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत प्रारंभी टाळण्यात आलेल्या या मुद्द्यावर मागील मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शवली होती.

- Advertisement -

मुंबईत येत्या काळात २२ हजार शौचालये बांधली जाणार

पालिका दरवर्षी एक ते दीड हजार कोटी रुपयांची रस्तेबांधणी करते. त्यानंतरही शहरातील खड्डे कायम राहात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी दर्जेदार रस्तेबांधणी करावी आणि कंत्राटदारांना जरब बसेल अशा अटी निविदांमध्ये ठेवण्याची सूचना काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. याशिवाय मुंबईत येत्या काळात २२ हजार शौचालये बांधली जाणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाली आहेत. मात्र या कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. झोपडपट्टी भागात शौचालयांच्या बांधकामांकडे पालिका लक्ष देत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.


नक्की वाचा – वनराई बंधाऱ्याची लोकचळवळ; एका दिवसात बांधले ४० बंधारे

- Advertisement -

 

झोपडपट्ट्यांमध्ये अद्याप पुरेसे पाणी मिळत नाही

मुंबईत मुस्लिम समाजाची स्वत:ची कब्रस्ताने असली तरीही ती लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी असल्याचे सांगितले. त्यामुळे पालिकेनेही कब्रस्ताने बांधून द्यावीत, असे सांगण्यात आले. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही मुंबईच्या विविध भागात पाणीटंचाई भेडसावते आहे. उपनगरात अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अद्याप पुरेसे पाणी मिळत नाही. पालिकेकडे याबाबत तक्रारी केल्यानंतर जलाशय आणि जलवाहिन्यांमधील तांत्रिक दोषांचे कारण दिले जाते. त्यावर उपाययोजना केल्या जाव्यात.

या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाणार

दक्षिण मुंबईत हाऊसगल्ल्यांच्या सफाईचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यावर उपाययोजना केली जावी, यासह विविध नागरी समस्यांचे प्रश्न नगरसेवकांनी आयुक्तांपुढे मांडले. काँग्रेसने केलेल्या बहुसंख्य सूचना आणि तक्रारींवर पालिका आयुक्तांनी समाधानकारक उत्तरे दिली. या प्रश्नांवर संबंधित विभागांना आणि अधिकार्‍यांना योग्य ते निर्देश दिले जातील व याचा पाठपुरावा केला जाईल. त्याची माहिती देण्यासाठी एक महिन्यानंतर पुन्हा नगरसेवकांसोबत एक बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.


हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका सज्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -