राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३०० पार गेल्यामुळे आता नागरिकांना अधित सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी काहीही झालं तरी घरात राहण्यास सांगण्यात येत आहे. पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. कारण कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू आता वाढू लागली आहे. एकट्या मुंबईतच १०० च्या आसपास रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आधी वरळी-कोळीवाडा, नंतर गोरेगाव बिंबीसार आणि काल रात्री अंधेरीतील बिंद्रा असे भाग सील करण्यात आले होते. आता प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त किंवा संशयित कोरोनाग्रस्त सापडल्यामुळे मुंबईतले तब्बल १४६ भाग सील करण्यात आले आहेत. मुंबई पालिकेकडून यासंदर्भातले आदेश देण्यात आले असून वॉर्डनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय, ठाणे, नवी मुंबईतही अनेक भाग सील करण्यात आले आहेत.
मुंबईतल्या २४ वॉर्डपैकी एकूण २१ वॉर्डमधले १४६ भाग सील करण्यात आले आहेत. यामध्ये बी, सी, डी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी या वॉर्डांचा समावेश आहे. त्याशिवाय, या भागांमध्ये सॅनिटायझेशनचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्याची देखील वॉर्डनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सील झाल्यानंतर काय होईल?
सील करण्यात आलेल्या भागांमध्ये पोलिसांना सक्तीने प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल. औषधं, भाजीपाला आणि किराणा घरपोच देण्याची सोय केली जाईल. त्यासोबत या भागांमध्ये सॅनिटायझेशनचं काम केलं जाईल. शिवाय, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केलं जाईल.
I like Maharashtra police