देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच याच महिन्यात तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशी शक्यता एसबीआयने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बिकट परिस्थिती उद्भवण्याचा इशाराही या अहवालात देण्यात आल्याने सरकारची झोप उडाली असून आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
याआधी, भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलही एसबीआयने भाकीत केले होते. मे महिन्यात भारतात कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठेल असा इशाराही एसबीआयने दिला होता. पण कोरोनाची दुसरी लाट एप्रिलमध्येच आली. मे महिन्यापर्यंत रुग्णसंख्याही वाढली. दिल्ली, महाराष्ट्र व केरळला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. जुलै महिना नुकताच सुरू झाला असून कोरोनाबाधितांचा आकडाही गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी आहे. पण एसबीआयने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊन ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असे भाकित केले आहे. पण देशात वेगाने लसीकरण सुरू असल्याने बाधितांची संख्या जरी जास्त असली तरी मृत्यूदर हा दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेल. असेही एसबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.