राज्यात लसीचा साठा संपला आहे. तर काही लसीकरण केंद्रांवर मोजक्याच लसींचा डोस शिल्लक आहे. मात्र नागरिकांनी लस घेण्यासाठी मुंबईतील कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मुंबईतील सर्वात मोठे असलेल्या जम्बो कोरोना लसीकरण सेंटरमध्ये कोरोना लसीचे फक्त १६० डोस आहेत. परंतु कोरोनाची लस घेण्यासाठी लोकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. बीकेसी केंद्रावर गर्दी झाल्यामुळे डॉक्टर आणि पोलीसांना नागरिकांची समजूत काढण्यासाठी चांगलीच दमछाक झाली होती. ज्या लोकांना दुसरा डोस देण्यात येणार होता त्यांची समजूत काढून घरी पाठवण्यात आले आहे. तर ज्या रुग्णांना प्रथम डोस देण्यात येणार आहे अशा मोजक्याच लोकांना कोरोना लसीकरण केंद्रात घेण्यात आले आहे. परंतु यावर मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणाबाबत सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागणीनंतर राज्याला कोरोना लसींचे डोस पुरवले जाती असे मोदींनी सांगितले असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दिवसाला मुंबईत ५० ते ६० हजार जणांचं लसीकरण करण्यात येते. परंतु राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. बीकेसीच्या केंद्रात १६० कोरोना लसी उपलब्ध आहेत. बीकेसी लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झाल्यानंतर हे केंद्र बंद करण्यात आले आहे. तसेच धारावी केंद्रावर १७००, मुंबईत फक्त १ दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कोरोनालसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लसीकरण केले जात आहे तर कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा घरी पाठवण्यात आले आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी पंतप्रधानांकडे राज्यासाठी लसीचा पुरवठा करण्याची विनंती केली आहे. यानंतर पंतप्रधानांनी लसीचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. आज दीड लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस पाठवणार असल्याचे सांगितले आहे. परंतु हेही डोस अपुरे पडणारे आहेत. असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : मुंबईत रेमडेसिवीरचा काळाबाजार, गुन्हे शाखेने केली दोघांना अटक