देशासह राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत होणारी ही वाढ राज्यातील आरोग्य यंत्रणांपुढील आव्हान आणखीनच बिकट करताना दिसत आहे. यात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र सध्याच्या घडीला मुंबईत कोरोना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळतेय.
मुंबईत कोरोना सक्रिय रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून मागील दहा दिवसांमध्ये कोरोनातून उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी मुंबईत ८२ हजार ६१६ उपचाराधीन कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर ११ एप्रिल रोजी ९२ हजार ४६४ रुग्ण बरे झाले होते. मुंबईत लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याचे मत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा वेग हा 50 दिवस इतका होता. मात्र शुक्रवारी रुग्णवाढ दुप्पटीचा दर 52 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे दोन आठवड्यांमध्ये उपाचाराधीन रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. यात मुंबईतील ८८ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. एकूण रुग्णांपैकी दोन ते तीन टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
याबाबत बोलताना मृत्यूदर समितीचे प्रमुख डॉ़. अविनाश सुपे म्हणाले, मृत्यूदर कमी करणे व लोकांचे जीव वाचवणे हा आरोग्य व्यवस्थेचा प्राधान्यक्रम आहे. कोरोनावर योग्य उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो त्यामुळे लक्षणे दडवून न ठेवता योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरु करण्याची गरज असते. दरम्यान काही रुग्ण चाचण्या न करता घरी राहत इतर मार्गाने निदान करत औषधोपचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रुग्णांची प्रकृती बिघडू शकते.
दरम्यान मुंबईत सध्या लक्षणे नसलेले ६५, ८९६ रुग्ण आहेत. तर लक्षणे असलेले १७,४१५ रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोाग्रस्तांचे बरे होण्याचे हे आकडे पाहता मुंबईत हेच चित्र कायम राहिल्यास पुन्हा एकदा हे शहर कोरोना नियंत्रणात आणण्यास यशस्वी ठरेल, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.