कोरोनाचे विषाणू प्लास्टिक पिशव्यांवर तीन दिवस जिवंत राहू शकतात. त्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत आवश्यक आहे. भाजीपाला प्लास्टिक पिशव्यांमध्ये आणल्यास विक्रीसही परवानगी नाही. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे. पालिका प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोना विषाणू हा प्लास्टिक पिशव्यांवर तीन दिवसापर्यंत जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी भाजीपाला व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी घरातून कापडी पिशवी घेवून जाणे आवश्यक आहे. भाजीपाला घेवून येणारे व्यापारी भाजीपाला, प्लास्टिक थैलीमध्ये घेवून येतांना आढळल्यास अथवा भाजीपाला प्लास्टिक थैलीमध्ये घेवून आल्यास त्याची विक्री करता येणार नाही. तसेच प्लास्टिक बंदी अधिनियम २०१८ नुसार संबंधिताविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सर्व व्यापाऱ्यांना महापालिकेतर्फे सुचित करण्यात आले आहे. महापालिकेच्या या सुचनेनूसार बहूतांश व्यापाऱ्यांनी गुरूवार २३ एप्रिलपासून प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला आहे. या प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यामुळे कचऱ्यातील प्लास्टिक मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, सर्व व्यापारी व नागरिक यांनीही भाजी विक्री अथवा खरेदी या कामासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून, असे आवाहन आयुक्त सूर्यवंशी यांनी केले आहे.
कल्याण -डोंबिवलीत नवीन ३ रूग्ण
कल्याण -डोंबिवली शहरात शनिवारी नवीन ३ रूग्ण आढळले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णांची संख्या ११७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, ३९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर ७५ रूग्णावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नवीन आढळलेल्या रूग्णामध्ये डोंबिवली पूर्वेतील ६१ वर्षीय व्यक्ती हा करोनाबधित रूग्णाच्या सहवासात आलेला असून, कल्याण पूर्वेत एका पोलिसांचा तर मांडा टिटवाळा येथील रूग्ण हा शासकीय रूग्णालयातील कर्मचारी आहे.