ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरले आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.
उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी ई–पीक पाहणी बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना ठाकरे यांनी आज कृषी विभागाने विकेल ते पिकेल ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.
मोबाईल ॲपमुळे शेतकरी वर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नसून शेतकऱ्यांनी कोणते पीक घेणे आवश्यक आहे?, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे?, कोणत्या पीकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे?, पिकाला योग्य भाव कसा मिळेल? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विकास रस्तोगी, निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, प्रकल्प सल्लागार सर्वश्री नरेंद्र कवडे, संभाजी कडू- पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा – मराठा आरक्षणा संदर्भात अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा!