गिरगाव चंदनवाडी येथे राहणारा २१ वर्षीय निलेश येडगे हा नेहमीप्रमाणे नवी मुंबईतील तेरणा इंजिनिअर कॉलेजहून घरी परतत होता. रोजच्या पूलावरुन घरी जाताना फक्त २ सेकंदामध्ये पूल खाली कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं. निलेशचे काका ३८ वर्षीय आत्माराम येडगे हे गेली १५ वर्षांपासून सीएसएमटीच्या या पुलाखाली केळी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. अचानक कोसळलेल्या पुलामुळे आत्माराम येडगेंवर पूल कोसळला. या घटनेत आत्माराम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय म्हणाला निलेश?
यावेळी निलेशने सांगितलं की, “त्याच ब्रिजखाली काकांचा केळे विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांना रोज हाक मारायला जातो. पण आज गेलो नाही. मात्र पुल उतरुन दोन सेकंदात धडाम आवाज आला आणि कोसळणाऱ्या ब्रिजकडे पाहून काकांची आठवण झाली. पाठी वळून पाहिलं पण पूर्ण पूल कोसळला होता.” त्याचवेळी ही घटना घडली. निलेशने आत्माराम यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या अंगावर पूर्ण मलबा पडला होता, असे निलेश म्हणाला. तर बाजूला करुन इतर लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. दोघातिघांची ढिगाऱ्याखालून सुटका केल्यावर निलेशने काकांना घेऊन जीटी हॉस्पीटल गाठले. निलेशच्या काकांना कंबरेला जबर मार लागला असून फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.
जीटी हॉस्पिटलला नातेवाईकांनी घेरले
जीटी हॉस्पीटल परिसर सध्या नातेवाईकांनी घेरले असून १४ जखमी दाखल आहेत. तर ३ मृत आणि २ गंभीर आहेत. मृतांमधे दोन्ही स्टाफ नर्स आहेत. मृतांमधील स्टाफ अपूर्वा प्रभू या ओटी विभागात कामाला होत्या. तर स्टाफ रंजना तांबे या ऑर्थो विभागात कामाला होत्या. दोन्ही रात्रपाळीकरिता कामाला येत होत्या. त्यावेळी घटना घडली.